
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारकडं विविध प्रश्न मांडणारे व वेगवेगळ्या मागण्या करणारे राज्यपालांना भेटण्यामागे नेमके काय कारण आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यापासून राजभवन सातत्यानं चर्चेत राहिले आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा, मंदिरं उघडण्याची मागणी अशा अनेक मुद्द्यांवर राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारच्या विरोधात व आक्रमक भूमिका घेतल्यानं ते चर्चेत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासही त्यांनी बराच वेळ घेतला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. राज्यपाल हे सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली होती. त्यानंतरही राज्यपालांची सक्रियात कमी झालेली नाही. विविध घटकांतील लोक सातत्यानं राज्यपालांना भेटून राज्य सरकारच्या विरोधात तक्रारी करत असतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही कंगना राणावत हिच्यासह अनेक लोकांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्याशिवाय, लॉकडाऊनच्या काळात राज्यपालांनी सरकारला काही सूचना कराव्यात अशा मागण्या घेऊनही राजकीय नेत्यांसह अन्य नेते राज्यपालांना भेटत आहेत. आता राज ठाकरे हे स्वत: भेटणार असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या अनेक मागण्या सरकारदरबारी पोहोचवल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा पत्र लिहिली होती. त्यातील काही पत्रांची सरकारकडून दखलही घेण्यात आली. मात्र, आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात मुंबईतील रेल्वे सेवा, धार्मिक स्थळे व शिक्षणाचा विषय आहे. यापैकी कोणत्या मुद्द्यावर राज ठाकरे आज राज्यपालांशी चर्चा करणार, याबद्दल उत्सुकता आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kRiu4d
0 Comments